
नांदेड, 31 डिसेंबर, (हिं.स.)। आघाडीत काँग्रेससोबत गेल्या आठ दिवसांपासून उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची जागा वाटपाबाबत चर्चा सुरु होती. परंतु, एवढे दिवस टाळाटाळ करून रात्री उशिरा आम्हाला आघाडी करणार नसल्याचा निरोप देऊन दगाफटका करण्यात आला. त्यामुळे उद्धवसेनेने ४० जागांवर उमेदवार दिल्याची माहिती महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी दिली.
मारावार म्हणाले, महापालिकेत काँग्रेससोबत आघाडीसाठी उद्धवसेना पदाधिकारी आग्रही होते. त्यासाठी काँग्रेसकडे २० जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासोबत आठ दिवसांपासून आमची चर्चाही सुरू होती. परंतु, कॉंग्रेसकडूनच आघाडीसाठी टाळाटाळ करण्यात येत होती,
त्यात रात्री उशिरा काँग्रेसने आघाडी करणार नसल्याचा निरोप दिला. त्यामुळे ऐनवेळी आमची धावाधाव झाली. परंतु, उद्धवसेना स्वबळावर ही निवडणूक लढविणार असून, ४० उमेदवार रिंगणात असल्याचेही मारावार म्हणाले, मनसेसोबत युती झाली नसली तरी काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढतीबाबतही विचार सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis