
अकोला, 5 डिसेंबर (हिं.स.)।
सातपुड्यात वसलेल्या मेळघाटचे वनवैभव, आदिम संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी जिल्ह्यात नरनाळा महोत्सव दि. 30 जानेवारी ते दि. 1 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. त्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, तसेच वनपर्यटन, नौकाविहार आदी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम असतील. त्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज अकोट येथे दिले.
महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत अकोट येथील उपविभागीय कार्यालयात झाली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. अकोटचे उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक राहूलसिंग तोलिया, उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील, तहसीलदार सुनील चव्हाण, समाधान सोनवणे व इतर अधिकारी, तसेच महोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.
पर्यटक, निसर्गमित्र व वनप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला नरनाळा पर्यटन महोत्सव 13 वर्षांनंतर पुन्हा आयोजित करण्यात येत आहे. मेळघाटचे समृद्ध वनवैभव, ऐतिहासिक नरनाळा किल्ला, आदिम संस्कृती व परंपरांचे दर्शन महोत्सवातून घडणार असून, नौकाविहार, सफारी, आदिवासी नृत्यकला सादरीकरण, पक्षीनिरीक्षण, गड भटकंती, गिर्यारोहण आदी साहसी खेळ, छायाचित्र प्रदर्शन याबरोबरच अनेकविध सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे. त्या अनुषंगाने स्थळ पाहणी जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी केली. यावेळी त्यांनी पोपटखेड येथील जलाशय प्रकल्प, शहानूर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी समिती सदस्य, स्थानिक प्रतिनिधींशी संवाद साधून चर्चा केली.
नौकाविहार, वनपर्यटनाबरोबरच पॅरासेलिंग व साहसी खेळांचा महोत्सवात समावेश आहे. वन्यजीवनाची सफर घडविण्याबरोबरच विविध कलाप्रदर्शनातून सातपुड्याच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. त्यासाठी सुसज्ज दालने, दर्जेदार उपक्रमांची आखणी करावी. महोत्सवाच्या दृष्टीने आवश्यक रस्तेदुरूस्ती, बस, इतर सुविधांची तयारी वेळेत करावी. महसूल, वनविभाग, पाटबंधारे विभाग यासह सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने महोत्सव यशस्वी करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
महोत्सवाची व्यापक प्रसिद्धी व्हावी. स्वयंसेवी संघटनांचा सहभाग मिळवावा. महोत्सवाची माहिती सर्वदूर पोहोचण्यासाठी व्हिडीओ, माहितीपट, बातम्या, फलक आदींद्वारे सर्वदूर प्रसिद्धी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे