
छत्रपती संभाजीनगर, 6 डिसेंबर (हिं.स.)। अन्नामृत फाऊंडेशन ही इस्कॉन अंतर्गत काम करणारी संस्था सामुहिक स्वयंपाक घराद्वारे आजमितीस जिल्ह्यातील (प्रामुख्याने शहरातील) ४० हजार बालकांपर्यंत शालेय पोषण आहार पोहोचविण्याचे काम करते. त्यामुळे दररोज ४० हजार बालकांची शाळा शाळांमधून ‘अंगत-पंगत’ घडविण्याची करामत अन्नामृत फाऊंडेशन करीत आहे.
शासन, स्वयंसेवी संस्था आणि उद्योगांमधील सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर करुन शालेय पोषण आहार तयार करुन तो वितरीत करण्यासाठी अन्नामृत या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे सामुहिक स्वयंपाकघर गरवारे स्टेडियम जवळच आहे. तेथे अत्याधुनिक पद्धतीने व बालकांच्या पोषणासाठी आवश्यक अन्न घटकांचा समावेश करुन अन्न शिजविले जाते व ते वेळेवर, स्वच्छता राखून शाळांपर्यंत पोहोचविले जाते.
छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागात ‘अन्नामृत’चे स्वयंपाक गृह आहे. ‘इस्कॉन’ तर्फे देशात असे २० स्वयंपाक गृह चालविले जातात. त्यातील एक छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. हे स्वयंपाकगृह १६८ शाळांमध्ये (प्रामुख्याने शहरी भागात) सुमारे ३८ हजार विद्यार्थी व ८० बालवाड्यांमधील ३५०० बालकांपर्यंत आहार पोहोचवितात.
‘अन्नामृत’चे स्वयंपाक घर हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन बनविलेले स्वयंपाक घर आहे. ह्या स्वयंपाक घरात अन्न बनविण्यासाठी थर्मल इन्स्युलेटर तंत्राचा वापर करण्यात येतो. त्यामुळे स्वयंपाक घरात जाळ, धूर विरहित उष्णतेद्वारे अन्न शिजविले जाते.
शिजवलेले अन्न मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठ्या कंटेनर्सचा वापर केला जातो. त्यासाठी प्रत्येक डब्ब्याला सिल करुन त्या सिलचा कलर कोड दिला जातो. त्यानुसार त्या डब्ब्यात काय पदार्थ आहे हे शाळेचे मुख्याध्यापक ओळखू शकता. एकूण १४ वाहनांद्वारे हे अन्न पोहोचविले जाते. शिवाय ज्या वाहनाद्वारे हे अन्न पोहोचविले जाते त्या प्रत्येक वाहनाचे जीपीएस ट्रॅकींग केले जाते. स्वयंपाक घरातून निघालेले वाहन हे रस्त्यात केवळ वाहतुक सिग्नल व्यतिरिक्त कुठेही थांबवता येत नाही. थांबते ते थेट शाळेतच. त्यामुळे वेळेवर आणि कमीत कमी वेळात अन्न पोहोचविता येते.
संस्थेच्या आहार बनविण्याच्या वेळापत्रकात व्हेज पुलाव, व्हेज खिचडी, मुगडाळ खिचडी, चना खिचडी, चना पुलाव, मटर पनीर भात, मटकी, सोयाबीन पुलाव, शेवग्याचे मुगडाळीचे वरण, भात याशिवाय चिक्की, खजूर अशा पोषणयुक्त आहाराचा समावेश केला जातो. जेणेकरुन बालकांना रोज वेगळ्या चवीचे पदार्थ खायला मिळतील व पोषणयुक्त आहार ही. त्यासाठी नवनवीन पदार्थ्यांचा व अन्न घटकांचा समावेश आहारात केला जातो,असे व्यवस्थापक सुदर्शन पोटभरे यांनी सांगितले.
आज टोफू पनीरचा वापर करुन मटर पनीर डिश बनवण्यात आली. त्यात मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे , काळे ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक अंकित काळे संचालक, कायगाव पेपर मिलचे चेअरमन प्रकाश राठी, वरिष्ठ व्यवस्थापक अलाइंड पॅकेजिंग कंपनी रविशंकर खानापुरे, वरिष्ठ व्यवस्थापक महिको समूह मिलिंद करंजीकर यांनी सहभाग घेतला व या मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत पोषण आहाराचा आस्वादही घेतला. याप्रसंगी राजन नाडकर्णी, अन्ननामृतचे सुदर्शन पोटभरे यांनी उपस्थितांना माहिती दिली. जिल्हा परिषद शाळा वरझडी तालुका छत्रपती संभाजीनगरचे मुख्याध्यापक अंकुश चव्हाण, मनपा शाळा नारेगाव येथील प्रतिनिधी विद्यार्थी व शिक्षक देखील उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis