नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जलतारा श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ
नांदेड, 6 डिसेंबर (हिं.स.)। जलतारा श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ आणि जागतिक मृदा दिन कंधार तालुक्यात शिरशी खुर्द येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नांदेड जिल्ह्यासाठी सुमारे एक लाख जलतारे निर्माण क
Q


नांदेड, 6 डिसेंबर (हिं.स.)।

जलतारा श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ आणि जागतिक मृदा दिन कंधार तालुक्यात शिरशी खुर्द येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नांदेड जिल्ह्यासाठी सुमारे एक लाख जलतारे निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य त्यांनी जाहीर केले असून या उपक्रमाचा औपचारिक प्रारंभ शिरशी खुर्द या गावातून करण्यात आला.

पावसाळी जलसंधारणाच्या संकल्पनेला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पावसाचे अतिरिक्त पाणी शक्य तितके शेतात मुरवून भूजलपातळी वाढविणे, जमिनीची धूप कमी करणे, जमिनीची पोत सुधारून उत्पादनक्षमता वाढवून नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे हा या अभियानाचा प्रमुख हेतू आहे.

याच अनुषंगाने मनरेगा विभाग आणि भारत रुरल लाइव्हलीहूड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचा कंधार व मुखेड तालुक्यातील अंमलबजावणीचा भाग अश्वमेध ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास व शैक्षणिक संस्था कंधार यांच्या माध्यमातून पुढे नेला जात आहे. प्रकल्पातील 35 गावांसाठी पाणलोट व्यवस्थापनाच्या वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित सविस्तर आराखडे तयार करण्यात आले असून मनरेगा अंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाशी संबंधित कामांना विशेष प्राधान्य देऊन जलसंधारण, मृदासंधारण आणि शाश्वत शेती या तिन्ही गोष्टींचा समन्वित विकास घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

जलतारा ही साधी पण अत्यंत प्रभावी रचना आहे. शेतातील पाणी साचण्याची आणि मुरण्याची क्षमता असलेल्या ठिकाणी 5 फूट रुंद, 5 फूट लांब आणि 6 फूट खोल असा खड्डा करून त्यामध्ये मोठी व मध्यम आकाराची दगडी सामग्री भरली की जलतारा तयार होतो. अशा एका जलताऱ्यामध्ये सुमारे 3.60 लाख लिटर पाणी जमिनीत मुरण्याची क्षमता असते. या पाण्यामुळे विहिरी आणि बोअरवेलचा पाणीसाठा वाढतो, शेतकरी पाण्याच्या तुटवड्यातून मोठ्या प्रमाणात मुक्त होतो आणि उपलब्ध पाण्याचा शाश्वत वापर शक्य होतो. मनरेगा तसेच प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पिक प्रात्यक्षिक उपक्रमांशी जलतारा निर्मितीची सांगड घालण्यात आल्यामुळे ग्रामपंचायतींना कुशल आणि अकुशल मनुष्यबळाचे संतुलित नियोजन करता येते, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होते आणि नैसर्गिक संसाधन संवर्धनाची चळवळ अधिक सशक्त बनते.

कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिलेयांनी पेठवडज परिसरातील विविध सेंद्रिय शेती गांडूळ खत निर्मिती युनिक भेट देऊन शेतकऱ्यांच्या शेतीपद्धती, जलतारे आणि प्रकल्पांच्या कामाची पाहणी करून त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. निसर्ग संवर्धनासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. रासायनिक इनपुटवरील अवलंबित्व कमी करून स्थानिक संसाधनांवर आधारित, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी शेतीप्रणाली विकसित करण्यासाठी त्यांनी शाश्वततेचा संदेश दिला.

या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात प्रमुख उपस्थितांमध्ये उपविभागीय अधिकारी विलास नरवडे, तहसीलदार रामेश्वर गोरे, नोडल अधिकारी चेतन जाधव, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, कृषी अधिकारी श्री. गुट्टे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होता. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, महसूल विभाग, मनरेगा सर्व कर्मचारी उत्कृष्ट सेंद्रिय शेतकरी पंजाबराव राजे (पेठवडज), जलतारा लाभार्थी नितेश कदम आणि अश्वमेध ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास व शैक्षणिक संस्था, कंधार यांच्याटीमने कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहून उपक्रमाविषयी उत्साह व्यक्त केला.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande