अकोला, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। बार्शिटाकळी तालुक्यातील चेलका व कातखेडा येथे नवरात्री दरम्यान बोकडाचा बळी देण्याची प्रथा दि. ३० सप्टेंबर व दि. १ ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्याचा प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी वर्षा मीना यांनी निर्गमित केला आहे.
याबाबत बार्शिटाकळी तालुक्यातील सराव येथील श्री गणेश गौरक्षण संस्थानतर्फे निवेदन देण्यात आले होते. धार्मिक स्थळी पशुहत्या बंदीबाबत कार्यवाही करण्यासंदर्भात शासनाच्या वतीने उच्च न्यायालयासमक्ष दिलेले आश्वासन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अन्वये सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यावर असलेले निर्बंध लक्षात घेऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अन्वये आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
त्यानुसार चेलका व कातखेडा येथील नवरात्र उत्सवात देवीचे मंदिर व २०० मीटर मंदिराच्या परिसरात दि. ३० सप्टेंबर व दि. १ ऑक्टोबर रोजी बोकडाचा बळी देण्यावर, तसेच सार्वजनिक ठिकाणी जाणा-या- येणा-या लोकांना त्रास होईल अशा रीतीने प्राण्यांच्या कत्तलीवर आदेशान्वये निर्बंध घालण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे