लातूर, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। औसा तालुक्यातील किल्लारी येथील ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच पोलीस दलामार्फत हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांनी यावेळी स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मृती जपण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्मृती वनात यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, गट विकास अधिकारी आनंद मिरगणे, किल्लारीच्या सरपंच सुलक्षणा बाबळसुरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis