
अकोला, 10 जानेवारी (हिं.स.)।
सध्याच्या महापालिका निवडणुकीत कोण कोणासोबत आहे, हे उमेदवारांनाही कळेनासं झालंय आणि मतदार तर पुरतेच गोंधळले आहेत!
राज्यात जे पक्ष विधानसभेत एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत, तेच महापालिकेत सोबत लढताना दिसतायत,तर जे सोबत आहेत, तेच एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरले आहे.
अकोल्यातही असाच काहीसा राजकीय चकवा पाहायला मिळतोय.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अर्थात RPI (A) यांची राज्यात आगामी २०२५–२०२६ महापालिका निवडणुकीसाठी महायुतीसोबत म्हणजे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) युती असल्याचं जाहीर करण्यात आलं, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे ही निवडणूक रिपाई लढत आहे.
मात्र प्रत्यक्ष अकोल्यात चित्र काहीसं वेगळंच दिसत आहे.महायुतीत असूनही अकोल्यात रिपाई (आठवले गट) ला एकही जागा सोडण्यात आलेली नाही.
यानंतर काय ? तर राजकीय गणिताने वेगळीच कलाटणी घेतली.महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ मध्ये महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर रिपाईचे महानगराध्यक्ष गजानन कांबळे यांनी आपल्या पत्नी स्मिता कांबळे यांच्यासाठी थेट काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली.गंमत म्हणजे
पत्नी काँग्रेसच्या उमेदवार,पती मात्र अजूनही रिपाई (आठवले गट) चे महानगराध्यक्ष आणि यावर कळस म्हणजे,
काल झालेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेत गजानन कांबळे हे थेट काँग्रेसच्या व्यासपीठावर उपस्थित.हे दृश्य पाहून राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे..
ही मैत्री आहे ? की छुपी युती, की फक्त राजकीय सोयीस्कर समजूत ?.
आता अकोल्यात “काँग्रेस + रिपाई (A)” या छुप्या युतीची चर्चा जोर धरू लागली असून,मतदार मात्र प्रश्न विचारतोय मत कुणाला द्यायचं आणि युती नेमकी कुणाची ?
राजकारणात काहीही शक्य असतं,
पण अकोल्यात सध्या एकच वाक्य चर्चेत आहे.
“पक्ष वेगळे, व्यासपीठ एकच .
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे