
लातूर, 10 जानेवारी (हिं.स.)।
भारतीय जनता पक्ष सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी बांधील आहे. त्यासाठी पक्षाचे हात बळकट करणे आवश्यक असून लातूरकर नागरिकांनी पुढाकार घेवून मनपात भाजपाची सत्ता आणण्यासाठी बहुमत मिळवून द्यावे, असे आवाहन निवडणुक प्रमुख माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
शहरातील प्रभाग १७ व १८ मध्ये आयोजित जाहीर सभेत आ. निलंगेकर बोलत होते. प्रभाग १७ मधील सभेस आ.अभिमन्यू पवार, डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, किरण उटगे, अरविंद पाटील निलंगेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. निलंगेकर म्हणाले की, येणाºया १५ तारखेला आपणास शहराच्या उज्ज्वल भवितव्यावर शिक्कामोर्तब करायचे आहे. येणाºया १५ तारखेला लातूर शहराच्या भविष्याची दिशा ठरणार आहे. आपण ही दिशा ठरविणार आहात. त्यामुळे मतदारांनी कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून भारतीयजनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन आ. निलंगेकर यांनी केले आहे.
आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच्या विकासाचा रोडमॅप तयार केला आहे. न मागता लातूर - मुंबई महामार्ग मंजूर केला आहे. लातूरच्या विकासासाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे.
डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की, केंद्र आणि राज्य सरकारचे लातूरवर विशेष लक्ष आहे. लातूर हे मराठवाड्यात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर आहे. मराठवाड्यातील पहिल्या क्रमांकाचे शहर म्हणून लातूरची ओळख निर्माण करण्यासाठी आपण भाजपाला पाठबळ द्यावे, असेही त्या म्हणाल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis