
पुणे, 14 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन सुधार अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील ६८ हजार लाभार्थी वगळण्यात आले आहेत. आधार क्रमांक आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीच्या आधारे जिल्हानिहाय संशयास्पद लाभार्थ्यांची यादी करून पुरवठा निरीक्षकांमार्फत घरोघरी तपासणी करून हा निर्णय घेण्यात आला आहे.केंद्र सरकारने राज्यातील शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी आधार आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीचा आधार घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील ८८ लाख ५८ हजार ५४० लाभार्थी संशयास्पद आढळले आहेत.त्यासाठी आधार क्रमांकातील त्रुटी असलेल्या लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत बांगलादेशी नागरिकांनी घुसखोरी केल्याचे दिसून आले आहे. अशा संशयास्पद आधार क्रमांक असलेल्या नागरिकांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येत आहे.पुरवठा निरीक्षक ही पडताळणी करत आहेत. पुणे जिल्ह्यात असे एक लाख ३५ हजार ११२ संशयास्पद लाभार्थी होते. त्यानुसार संशयास्पद असलेल्या लाभार्थ्यांच्या माहितीत तथ्य आढळल्याने ती नावे वगळण्याची शिफारस निरीक्षकांनी तहसीलदारांकडे केली होती. नावे वगळण्याचा अंतिम अधिकार तहसीलदारांना असल्याने आतापर्यंत ६८ हजार ३०९ लाभार्थी वगळण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक ११ हजार ३३६ लाभार्थी इंदापूर तालुक्यातील आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु