
ठाणे, 15 जानेवारी, (हिं.स.)। नॅरेटीव्हची लढाई सर्वच स्तरावर सुरू आहे, त्यात तुम्ही कठपुतली बनु नका, तर सजग प्रेक्षक बना! पडद्यावर जे दाखवले जाते त्याची साधक बाधक चर्चा करून रसग्रहण करा. असे आवाहन लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते योगेश सोमण यांनी रसिकांना केले. ठाण्यातील रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत चित्रपटसृष्टीची बदलती परिभाषा हे सातवे आणि अंतिम पुष्प सोमण यांनी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते.
ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कुलच्या प्रांगणात ०८ जाने. पासुन आठवडाभर सुरु असलेल्या ४० व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचा समारोप सोमण यांच्या व्याख्यानाने झाला. या प्रसंगी, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष अभिनेते उदय सबनीस, शरद पुरोहीत, सौ. कमल संजय केळकर, सुहास जावडेकर, माधुरी ताम्हाणे, विजय जोशी आदीसह अनेक रसिक श्रोते उपस्थित होते. अभिनयासोबत स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणा अंगी बाणवलेल्या योगेश सोमण यांनी, चित्रपटसृष्टीसह नाटक व माध्यमातील अन्य करमणुकीवर सडेतोड भाष्य केले. करमणुकीच्या कुठल्याही सादरीकरणाचा भारताच्या समाजमनावर काहीही परिणाम होत नाही हे स्पष्ट करताना सोमण यांनी, 'घाशीराम कोतवाल' नाटकाच्या नांदीपासुन कथानकापर्यंत आणि किर्तनाच्या फॉर्ममध्ये मांडलेल्या 'महानिर्वाण' नाटकाची खुमासदार मिमांसा केली. चित्रपटांमधील सिनेमॅटीक विरोधाभास दर्शविताना सोमण यांनी, शोले व अन्य चित्रपटांचे दाखले देत, इकोसिस्टममधील समिक्षकांच्या एकंदरीत दृष्टीकोनाबद्दलही नाराजी दर्शवली. सिनेमातील ७८६ बिल्ला अशा छोट्या छोटया गोष्टीतुन नॅरेटीव्हची सुरुवात सिनेमांमधुन झाल्याचे नमुद करून सोमण यांनी,
२००१ ते २०१४ पर्यंत विविध माध्यमातुन मोदींना, रावणापेक्षाही मोठा मौत का सौदागर म्हणणे, तसेच मोदी पंतप्रधान बनणे हा व्यापक कट होता असे वक्तव्य करून त्यांना व्हीलन ठरवण्याचा प्रयत्न केले गेले. मात्र, कायद्याच्या व्यासपीठांवर देशवासिंयांनी अशा खोट्या नॅरेटीव्हला झुगारून दिले, तरीही, सर्वच स्तरावर नॅरेटीव्हची लढाई सुरू असुन त्यात तुम्ही कठपुतली बनु नका. असे सांगुन सोमण यांनी समविचारी बनुन आपल्यासोबत येण्याचे आवाहन रसिकांना केले. यावेळी व्याख्यानमालेच्या आयोजकांनी उपस्थित श्रोत्यांना मकर सक्रांतीनिमित्त तिळगुळ भेट देऊन कार्यक्रमाचा समारोप केला.
सिनेमे कायमच व्यवस्थेच्या विरोधात असतात. बस्तर चित्रपट आल्यानंतर खऱ्या अर्थाने नक्षलवाद काय हे कळलं. तर, उरी चित्रपटातील वास्तवामुळे नॅरेशन हळुहळु बदलत असल्याचे दिसले. सिनेमात जे पडद्यावर दाखवले जाते तेच प्रेक्षकांनी बघायचे असते आणि नाटक पहाताना प्रेक्षकांना स्वातंत्र्य असते. असे नमुद करून सोमण यांनी, थिएटर आणि प्रेक्षक नसतानाही कोर्ट आणि कासव या मराठी चित्रपटांना नॅशनल पुरस्कार मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. तेव्हा, समाजात बदलत जाणारे विमर्श आपल्याला कळले पाहिजेत. असा आग्रह करून नाटक आणि चित्रपटाविषयी श्रोत्यांची रसास्वाद कार्यशाळा घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर