
रत्नागिरी, 19 जानेवारी, (हिं. स.) : महायुतीतील भाजपाकडून कुवारबाव पंचायत समिती गटात उमेदवारी नाकारल्याने आणि नैसर्गिक युतीत अन्यायकारक वागणूक मिळाल्याने गटातील ५७ प्रमुख व सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.हे राजीनामे माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व खासदार नारायण राणे यांच्याकडे पाठवली जातील, असे प्रतीक देसाई यांनी स्पष्ट केले.
राजीनामा दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, यापुढे ते कार्यकर्ते-पदाधिकारी फक्त पक्षाचे शुभचिंतक आणि मतदार राहतील, भाजपाच्या संघटनात्मक कार्यात सहभागी राहणार नाहीत. कुवारबाव पंचायत समिती गटातील या पदाधिकाऱ्यांना अपेक्षित उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांचा असंतोष वाढला. महायुतीतील अंतर्गत कलह आणि अन्यायकारक निर्णयांमुळे राजीनामे सुपूर्द करताना पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी