कोकणातील संस्कृत विद्वानांचे कार्य जिवंत झऱ्याप्रमाणे - प्रा. दिनेश रसाळ
रत्नागिरी, 19 जानेवारी, (हिं. स.) : कोकणातील संस्कृत विद्वानांचे कार्य जिवंत झऱ्याप्रमाणे आहे, असे गौरवोद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रा. दिनेश रसाळ यांनी काढले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग, संस्कृत साहित्य अकादमी आणि कवि
कोकणातील संस्कृत अभ्यासक चर्चासत्र


रत्नागिरी, 19 जानेवारी, (हिं. स.) : कोकणातील संस्कृत विद्वानांचे कार्य जिवंत झऱ्याप्रमाणे आहे, असे गौरवोद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रा. दिनेश रसाळ यांनी काढले.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग, संस्कृत साहित्य अकादमी आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रातर्फे आयोजित कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान या चर्चासत्रात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

प्रास्ताविकात संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी चर्चासत्राचा उद्देश आणि कोकणातील विद्वान परंपरा यावर भाष्य केले. या वेळी प्रा. दिनेश रसाळ म्हणाले की, कोकण निसर्गाने जेवढे समृद्ध आहे तेवढेच बुद्धिमत्तेने संपन्न, समृद्ध आहे. कोकणात अनेक संस्कृत विद्वान होऊन गेले. ज्यांनी भरीव कार्य केले. कोकणात विद्वानांची दीर्घ परंपरा आहे. भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे, वामन शिवराम आपटे, लोकमान्य टिळक, पी. के. गोडे, वरदानंद भारती, श्री वासुदेवानंद टेंब्ये स्वामी महाराज यांसारख्या विभूती होऊन गेल्या. कोकणाच्या भूमीत जन्मलेल्या विद्वानांनी व्याकरण, वेदांत, तत्त्वज्ञान यासारख्या अनेक विषयांवर चतुरस्र, भरीव काम केले आहे.

ब्रिटिशांकडून बापूदेवशास्त्रींना महामहोपाध्याय पदवी

कोकणात जन्मलेले नृसिंह सीताराम परांजपे ज्यांना बापूदेवशास्त्री या नावानेदेखील ओळखले जाते. व्हिक्टोरिया राणीचा सुवर्णमहोत्सव जेव्हा साजरा केला जात होता, तेव्हा बापूदेव शास्त्री यांचा कार्यकर्तृत्वाचा आवाका पाहून तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांना महामहोपाध्याय ही उपाधी दिली. त्यामुळे भारतातील पहिले महामहोपाध्याय म्हणून बापूदेव शास्त्री यांची विशेष ख्याती आहे. जी कोकणासाठी अभिमानास्पद बाब आहे, असे प्रा. रसाळ म्हणाले.

चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे प्रकाश देशपांडे म्हणाले की, धर्मशास्त्राला वेगवेगळे आयाम देण्याचे कार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केले. बापूशास्त्री छत्रे यांनी प्रथम संस्कृत भाषेतील कथा मराठीत आणल्या. कोकणातील जनुभाऊ निमकर यांनी काशीला जाऊन कालिदास लिखित शाकुंतल संस्कृतमधून सादर केले होते. त्यामुळे कोकणात असलेली परंपरा पाहता संस्कृतशिवाय आपल्या वाणीला व देशाला मार्ग नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande