
कोल्हापूर, 02 जानेवारी (हिं.स.)। ऊसतोड मजुरांना साखर कारखान्यांकडून जास्तीत जास्त सुविधांचा लाभ मिळावा तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी कार्यरत रहावे. तथापि यामध्ये आचारसंहितेची अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले . गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अनुदान योजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.
ते म्हणाले,ऊसतोड कामगारांच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात सुमोटो रिट याचिका दाखल असून या रिट याचिकेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी त्यांच्याकडे असणारी पूर्ण माहिती द्यावी.जिल्ह्यात एकूण 822 विद्यार्थी साखर शाळेपासून वंचित आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत समाविष्ट करावे.एक ही मुलगा शाळेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता कारखानदारांनी व शिक्षण विभागाने घ्यावी . त्याचबरोबर बैलांचे टॅगिंग करावे.या योजनेच्या अनुषंगाने त्रुटींची पूर्तता पूर्ण करून पुन्हा प्रस्ताव पाठवावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या.
सन 2025 - 26 या वर्षामध्ये ऊसतोड कामगार सानुग्रह अनुदान योजनेसाठी 20 प्रस्ताव प्राप्त झाले असून अनुदानासाठी 8 प्रस्ताव पात्र असल्याची माहिती गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांनी दिली .यावेळी महिला बाल विकास,शिक्षण, कामगार,परिवहन,पुरवठा,साखर,पोलीस विभागाचे त्याचबरोबर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar