
कोल्हापूर, 05 जानेवारी (हिं.स.)। २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सुरुवात आज कोल्हापुरात उत्साहात झाली. ज्येष्ठ रंगकर्मी संजय तोडकर, अविनाश देशमुख, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्याध्यक्ष व नाट्यवितरक आनंद कुलकर्णी, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे तसेच स्पर्धेचे परीक्षक गिरीश भुतकर, हनुमान सुरवसे आणि वैदेही चवरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.
बालरंगभूमीसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी संजय तोडकर व अविनाश देशमुख यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. सन्मान स्वीकारल्यानंतर अविनाश देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “अशा स्पर्धांमुळे मुलांच्या भावविश्वाला चालना मिळते. आजचा काळ जरी ऑनलाइन माध्यमांचा असला, तरी बालनाट्याच्या माध्यमातून मुलांच्या सर्जनशीलतेला प्रत्यक्ष वाव मिळतो. त्यामुळे मुलांसाठी दर्जेदार आणि आशयघन संहिता निर्माण होणे ही काळाची गरज आहे. कोल्हापुरातील बालनाट्य चळवळीला अधिक वेग येणे आवश्यक असून पुणे-मुंबईसारख्या शहरांप्रमाणे येथेही मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबवले गेले पाहिजेत. यासाठी रंगकर्मींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.”
दरम्यान, एम.एल.जी. हायस्कूलच्या शिक्षिका विशाखा जितकर यांचाही त्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ बालसाहित्यिक गोविंद गोडबोले यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विविध संघांनी आपली बालनाट्ये सादर केली. यामध्ये पेठ वडगाव येथील आदर्श गुरुकुल विद्यालयाचे ‘बालपण हरवले रे देवा’, ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे ‘झेप’, कमशिप्र मंडळाच्या आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ यांचे ‘मनातल्या भुतांची ऐशीतैशी’, कुडाळ हायस्कूलचे ‘बीज अंकुरले’, बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांचे ‘उंदीर मामाची जादुई दुनिया’ तसेच बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ यांचे ‘पक्ष्यांचे कवी संमेलन’ या नाटकांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले. यावेळी कोल्हापूर परिसरातील नाट्यरसिक, शिक्षक, विद्यार्थी आणि रंगकर्मी उपस्थित होते. ही स्पर्धा शनिवारपर्यंत सुरू राहणार असून कोल्हापूर व कोकण विभागातील विविध संघ आपली बालनाट्ये सादर करणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar