
कोल्हापूर, 05 जानेवारी (हिं.स.)। माणगाव ता. हातकणंगले येथे १९२० मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ऐतिहासिक भेट झाली होती. या भेटीचे चित्रण विश्वविक्रमी रांगोळीतून ताराराणी ब्रिगेड यांच्यावतीने साकारण्यात आले आहे. यासाठी साडेआठ टन रांगोळीचा वापर केला आहे.
ही विश्वविक्रमी रांगोळी कलाकार समीर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोनाली पाटील व आशा चव्हाण यांच्यासह प्रतिष्ठानचे ११ रंगारी व १५० युवतींनी दररोज दहा तास चित्र रेखाटून पूर्ण केली आहे. ही रांगोळी सोमवारपर्यंत पाहण्यासाठी खुली राहणार आहे.
माणगाव परिषदेस १०६ वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे औचित्य साधून येथील सव्वा एकर जागेवर २५ डिसेंबरपासून ही रांगोळी रेखाटनास प्रारंभ करण्यात आला आहे. यासाठी साडेआठ टन रांगोळीचा वापर केला आहे.
या रांगोळीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड विविध रेकॉर्डमध्ये होणार आहे. माणगाव येथे स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेडमार्फत विश्वविक्रमी रांगोळी साकारलेल्या या रांगोळीमुळे माणगावचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले, असे प्रतिपादन सरपंच डॉ. राजू मगदूम यांनी केले.
प्रारंभप्रसंगी उपसरपंच विद्या जोग, वैभव कांबळे, स्व युवा प्रतिष्ठानचे समीर काळे, सुहास लाटवडेकर, सहायक उपनिरीक्षक वाकळे, सुरजित चव्हाण, मारुती पाटील, अमित भोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेडच्या महिला रणरागिणी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar