
मुंबई, 06 जानेवारी (हिं.स.)। मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून पश्चिम रेल्वेमार्गावर येत्या दोन दिवसांत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सुरू असलेल्या सहाव्या रेल्वे मार्गाच्या उभारणीच्या कामामुळे मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस मोठा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकचा थेट परिणाम लोकल सेवांवर होणार असून एकूण २१५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरांतून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, कांदिवली-बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गाचे काम वेगाने सुरू असून २० डिसेंबर ते १८ जानेवारीदरम्यान टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेपर्यंत जलद मार्गांवर मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. कांदिवली स्थानक परिसरात पायाभूत सुविधांच्या कामासाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हा ब्लॉक प्रामुख्याने मध्यरात्रीच्या वेळी असला, तरी त्याचा थेट परिणाम पहाटेच्या आणि सकाळच्या सत्रातील लोकल फेऱ्यांवर होणार आहे. मुंबईतील अप जलद मार्गावर मंगळवारी मध्यरात्री १२:०० ते बुधवारी पहाटे ५:३० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर डाऊन जलद मार्गावर मंगळवारी मध्यरात्री १:०० ते पहाटे ४:३० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत मंगळवारी ९३ फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर बुधवारी १२२ फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसात २१५ फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.
विशेष म्हणजे, रद्द करण्यात आलेल्या फेऱ्यांमध्ये प्रवाशांच्या पसंतीच्या एसी (AC) लोकल आणि १५ डब्यांच्या जलद गाड्यांचाही समावेश आहे. या काळात पाचव्या मार्गिकेवरील वाहतूकही पूर्णपणे बंद राहील, ज्यामुळे नियमित वेळापत्रकावर मोठा परिणाम होऊन गाड्या विलंबाने धावण्याची शक्यता आहे. याचा फटका लोकल प्रवाशांना बसणार आहे.
लोकल प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी मात्र रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. नवीन वर्षातील प्रवाशांची वाढती गर्दी आणि वेटिंग लिस्ट लक्षात घेता ३१ जानेवारी २०२६ पर्यंत महत्त्वाच्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत. मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या तेजस राजधानी (१२९५१/५२) गाडीला एक जादा 3AC डबा जोडला आहे, आता ही ट्रेन २२ डब्यांसह धावेल. तसेच साबरमती ते नवी दिल्ली दरम्यानच्या स्वर्ण जयंती राजधानी (१२९५७/५८) या गाडीला एक अतिरिक्त 3AC डबा जोडून ती २३ डब्यांची करण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेस या गाडीलाही अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule