
बीड, 16 मार्च (हिं.स.)। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे थकीत हप्ते १५ एप्रिलपूर्वी एकत्रितपणे बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजनेतंर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. तांत्रिक कारणांमुळे फेब्रुवारीचा हप्ता रखडला होता, मात्र आता दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये महिलांच्या खात्यात वर्ग केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या योजनेसाठी भरीव तरतूद केल्याने ही योजना अव्याहतपणे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, त्यांना ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. ही तांत्रिक पूर्तता न करणाऱ्या महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis