

रायगड, 16 मार्च (हिं.स.)। जिल्हा न्यायालय रायगड, अलिबाग येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन दृकश्राव्य प्रणालीद्वारे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र सावंत उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात राजेंद्र सावंत यांनी लोक अदालतीचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. लोक अदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून जलदगतीने निकाली निघतात. त्यामुळे संबंधित पक्षकारांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, न्यायालयीन प्रक्रियेत अनेकदा निकाल एका बाजूने लागतो, मात्र लोक अदालतीत दोन्ही पक्षकारांमध्ये सामंजस्याने तडजोड होऊन तोडगा निघत असल्याने दोन्ही बाजूंना समाधान मिळते. वर्षानुवर्षे चालणाऱ्या दिवाणी व फौजदारी प्रकरणांमुळे पक्षकारांना मोठा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. लोक अदालतीच्या माध्यमातून या समस्यांवर प्रभावी तोडगा निघू शकतो.
वकिलांनी आपल्या पक्षकारांना प्रकरणातील जमेच्या व उणीवांच्या बाजू स्पष्ट करून त्यांना तडजोडीसाठी प्रवृत्त करावे, असेही त्यांनी नमूद केले. कौटुंबिक वाद, मालमत्ता वाद तसेच इतर नागरी प्रकरणे सामोपचाराने सोडविण्यासाठी लोक अदालतीचे महत्त्व मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)