
मुंबई, 18 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्राच्या महसूल खात्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा उघड झाला आहे, अशी धक्कादायक माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली. शुद्धलेखन दुरुस्तीच्या नावाखाली ७/१२ उताऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
बावनकुळेंनी दिलेल्या माहिती नुसार, महसूल विभागाच्या कलम १५५ चा गैरवापर करून सुमारे एक ते दीड लाख शेतकऱ्यांना फसवण्यात आले. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींमध्ये त्यांची संमती न घेता बदल करण्यात आले, मालकी हक्कांवर परिणाम झाला आणि काही ठिकाणी बेकायदेशीररित्या जमीन हस्तांतरणही झाले. या गंभीर प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान, या मुद्द्यावर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करून महसूल अधिकाऱ्यांकडून अधिकारांचा गैरवापर होत असल्याचे सांगितले. त्यांनी नमूद केले की, दुरुस्तीच्या नावाखाली अधिकारी फेरफार करतात आणि शेतकऱ्यांना वारंवार दिरंगाईचा सामना करावा लागतो.
या सर्व प्रकरणावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक तक्रारी समोर आल्या आणि कलम १५५ चा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे स्पष्ट झाले. “केवळ शुद्धलेखन दुरुस्त करण्यासाठी असलेले हे कलम वापरून मालकी हक्कांमध्ये बदल करण्यात आले, ज्यामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर झाला आणि गरीब शेतकऱ्यांची फसवणूक झाली,” असे त्यांनी सांगितले.पुणे जिल्ह्यात जुलै-ऑगस्ट २०२५ दरम्यान हा प्रकार उघडकीस आला असून, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालात महसूल प्रशासनातील गंभीर त्रुटी उघड झाल्या. अनेक प्रकरणांत मूळ मालकाची परवानगी न घेता ७/१२ उताऱ्यांमध्ये बदल करण्यात आले तसेच बिगरशेती प्रक्रियेतही अनियमितता आढळून आली.
बावनकुळे यांनी सांगितले की, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत. राज्यभरातील सर्व संशयित नोंदी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून पुढील सात दिवसांत कारवाई सुरू केली जाईल. “कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule