
अकोला, 18 मार्च (हिं.स.)।भगवान श्री राम यांच्या जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर, रामनवमी निमित्त अयोध्येत भक्तीचा अनोखा सोहळा रंगणार आहे. या दिवशी अकोला शहरातील अभ्यंकर परिवाराच्या हस्ते तब्बल ३ लाख राजगिरा लाडूंचे प्रसादरूपाने वाटप करण्यात येणार आहे.
मागील वर्षीही अभ्यंकर परिवाराने १ लाख लाडूंचे वाटप करत सेवाभाव जपला होता. यंदा हा आकडा तिप्पट करत त्यांनी आपली श्रद्धा आणि भक्ती अधिक दृढ केली आहे. राम मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने अभ्यंकर परिवाराला ही सेवा देण्याची विनंती करण्यात आली होती.सध्या अकोल्यात ३ लाख राजगिरा लाडू तयार करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या उपक्रमासाठी सुमारे १५०० किलो गूळ आणि १५०० किलो राजगिरा लाहीचा वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, अभ्यंकर परिवाराच्या सदस्यांसोबतच त्यांच्या या कार्यात अकोलेकर नागरिकही निस्वार्थ भावनेने हातभार लावत असून, वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले आहे.२२ मार्च रोजी हे सर्व लाडू ट्रकद्वारे अयोध्या येथे पाठवण्यात येणार असून, रामभक्तांना मोफत प्रसाद म्हणून वितरित केले जाणार आहेत.अभ्यंकर परिवाराच्या या सेवाभावी उपक्रमामुळे अकोल्याचे नाव देशभरात उजळले असून, श्रद्धा, सेवा आणि भक्तीचा हा अनोखा संगम सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे