
मुंबई, 18 मार्च, (हिं.स.)। वसई-विरार महानगरपालिकेसाठी सुधारित विकास आराखड्याची प्रक्रिया नियमानुसार सुरू असून ऑक्टोबर २०२३ मध्ये विकास आराखडा तयार करण्याचा हेतू जाहीर करण्यात आला आहे. आवश्यक प्राथमिक टप्पे पूर्ण झाले असून २२ ऑक्टोबर २०२५ रोजी उपसंचालक दर्जाचे नगरविकास अधिकारी नियुक्त करून संपूर्ण पथक कार्यरत करण्यात आले आहे. तसेच विहित मुदतीत विकास आराखडा जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली..
वसई-विरार महानगरपालिकेसाठी सुधारित विकास आराखडा (डीपी) तयार करण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ अपुरे असल्याच्या पार्श्वभूमीवर एमआरटीपी अक्ट कलम १६२ अंतर्गत एमएमआरडीए मार्फत तज्ज्ञ समिती गठीत करण्याची मागणी सदस्य राजन नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे मांडली.या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या. या चर्चेत सदस्य स्नेहा दुबे व योगेश सागर यांनीही सहभाग घेतला.
या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, विकास आराखड्यात उच्च-वेग रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पाचा समावेश करण्यात आला असून भविष्यातील बदल सुधारित आराखड्यात समाविष्ट केले जातील. याशिवाय, आराखड्याच्या गुणवत्तेसाठी सल्लागार (कन्सल्टंट) नेमण्यात आला असून हरित पट्टे व इतर मुद्द्यांबाबत सर्व संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन सविस्तर आढावा घेण्यात येईल.
वसई-विरार महानगरपालिकेसाठी आयएएस दर्जाचा आयुक्त नियुक्त करण्याच्या मागणीबाबतही सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर