
सोलापूर, 20 मार्च (हिं.स.)। बार्शी तालुक्यात गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 3.45 वाजता विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तब्बल सव्वा तास अवकाळी गारांचा पाऊस झाला. अवकाळी पाऊस झाल्यामुळे तालुक्यात सुगी चालू असलेल्या ज्वारी, गहू, हरभरा, या पिकाबरोबरच द्राक्षे व वेलवर्गीय पिकांची मोठी आर्थिक हानी झाली.
पांगरी, मळेगाव, चिखर्डे, गोरमाळे, हिंगणी, कारी आदी परिसरात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात, रस्त्यावर मोठ मोठे वृक्ष मुळासकट उन्मळून पडले होते. अनेक शेतकऱ्यांनी काढून टाकलेले ज्वारीची पेंड्या वादळी वाऱ्याबरोबर उडून गेल्या. आणेक भागात विज वाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. दुपारी अचानक वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारपीट झाल्यामुळे शेतामधील काढून टाकलेल्या ज्वारी, गहू व इतर पिकाचे नुकसान झाल्याचे मळेगावातील शेतकरी संतोष निंबाळकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड