
रायगड, 20 मार्च 2026 (हिं.स.) : उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामासाठी तब्बल ८ कोटी ८१ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर असूनही, शासनाला अद्याप एकही सक्षम ठेकेदार मिळालेला नाही. यामुळे ७७ गावांतील नागरिकांचे पिण्याचे पाणी धोक्यात आले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या कामासाठी चार वेळा ई-निविदा जाहीर केल्या, परंतु पहिल्या तीन निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. चौथ्या निविदेत दोन अर्ज आले तरी, आवश्यक कागदपत्रांच्या त्रुटींमुळे तेही रद्द करण्यात आले. परिणामी, धरणातील गाळ काढण्याचे काम आजही प्रलंबित आहे.उमटे धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणारी पाणीपुरवठा योजना देखील अडचणीत आली आहे. गाळ साचल्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावत असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत.
याबाबत उमटे धरण संघर्ष ग्रुपचे ऍड. राकेश पाटील यांनी प्रशासनावर टीका करत म्हटले, “ठेकेदार मिळत नाही की शासनाला काम करायचे नाही?” त्यांनी निविदेच्या अटी-शर्ती शिथिल करून तात्काळ काम सुरू करण्याची मागणी केली आहे.स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आधी तात्पुरता प्रयत्न करून गाळ काढण्याचा पुढाकार घेतला, परंतु शासनाची निष्क्रियता सुरू असल्यामुळे येत्या काळात मोठा जनआक्रोश उसळण्याची शक्यता आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)