
सोलापूर, 20 मार्च, (हिं.स.)। उन्हाचा तडाखा वाढल्याने उजनी धरणातून शेतीसाठी पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे.कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन आता मुख्य कालव्यातून तीन हजार क्युसेक आणि भीमा-सीना जोड कालव्यातून (बोगदा) नऊशे क्युसेकने पाणी सोडले आहे. उजनी धरणात सध्या ३१ टीएमसी (५७.८० टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी धरणात ३० टक्क्यांपर्यंत पाणी होते.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा २८ टक्के पाणीसाठा अधिक आहे. शेतीसाठी सोडलेले हे पाणी शेतकऱ्यांसाठी अडीच महिने (मेअखेर) सलग सोडले जाणार आहे. पुढे जूनमध्ये पावसाळा सुरु होतो, पण यंदाच्या वर्षी कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन पुढे उजनीतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाऊ शकते.सोलापूर शहरासाठी समांतर जलवाहिनी झाल्याने आता प्रत्येक दीड-दोन महिन्यानंतर धरणातून भीमा नदीद्वारे सोडले जाणारे पाणी यंदा सोडलेले नाही. नदी काठावरील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मागील महिन्यात भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता दुसऱ्यांदा मे महिन्यात भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड