
लातूर, 20 मार्च (हिं.स.)।
: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी एक गाव, एक कृषी अवजारे बँक या तत्त्वावर महिला शेतकरी गटांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत महिला स्वयंसहाय्यता गट, उमेद महिला गट किंवा महिला ग्राम संघ यांना गावस्तरावर कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा यंत्रसामग्रीवर होणारा खर्च कमी होईल आणि शेती उत्पादकता वाढेल. निवड झालेल्या महिला गटाला कमाल ४० लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. फार्मर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला शेतकरी गटांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल. तरी इच्छुक महिला गटांनी https://dbt-ndksp-agribusiness.mahapocra.gov.in/ या अधिकृत पोर्टलवर जाऊन ५ एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, प्रत्येक गावातील पात्र गटांची निवड पारदर्शक पद्धतीने केली जाईल. लातूर जिल्ह्यातील महिला गटांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक दिलीप जाधव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis