
बीड, 21 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यात मागील दोन दिवसांत झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
या नैसर्गिक आपत्तीमुळे बीड, वडवणी आणि आष्टीसह अनेक तालुक्यांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने काढणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी आणि कांदा या पिकांसह आंबा, टरबूज व मोसंबीच्या फळबागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी मळणीसाठी काढून ठेवलेली पिके पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पंकजा मुंडे यांनी प्रशासनाकडून नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. बळीराजावर कोसळलेले हे संकट पाहता शासनाच्या संबंधित विभागांमार्फत योग्य मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis