
सोलापूर, 21 मार्च (हिं.स.)। मराठी नवीन वर्षातील पहिल्या चैत्री एकादशीचा सोहळा येत्या २९ मार्च रोजी साजरा होणार आहे. वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता यासह दर्शन बारीतील सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वारकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून दर्शनव्यवस्था करण्यात आली आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च ते २ एप्रिलपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी येथे दिली.
यात्रा नियोजनासंदर्भात येथील भक्तनिवासामध्ये मंदिर समितीची बैठक झाली. बैठकीमध्ये यात्रेसंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा झाली. शिवाय मंदिर जतन संवर्धनाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या चरणाची झालेली झीज भरून काढण्यासाठी इपॉक्सी (रासायनिक प्रक्रिया) बाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड