
पुणे, 27 मार्च (हिं.स.) : अमेरिका-इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने पाइपद्वारे नैसर्गिक गॅस (पीएनजी) नेटवर्क असलेल्या ठिकाणी जोडणी घेणे अनिवार्य केले आहे. हे आदेश विशेषतः एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने दिले आहेत.
योजनेअंतर्गत महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) मोठ्या प्रमाणात नवीन जोडण्या देण्याचे काम हाती घेणार आहे. पीएनजीचे उत्पादन देशांतर्गत केले जाते आणि त्याचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे १०० टक्के वितरण सुरू आहे.
सोसायटीमध्ये पीएनजीची लाईन असलेल्या सदनिकांनी जोडणी घेतल्यास त्यांना १५०० रुपयांची सवलत दिली जाईल. तसेच, नवीन भागातील जोडणीची विनंती आल्यास लवकरात लवकर सेवा पुरवली जाईल.
सध्या शहरातील मोठ्या सोसायटी, सर्वाधिक सोसायटी असलेले भाग आणि बैठक घरे असलेल्या भागातही पीएनजी उपलब्ध आहे. तांत्रिकदृष्ट्या ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या सर्व भागात अधिकाधिक जोडणी देण्याचे नियोजन एमएनजीएलने केले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु