
अमरावती, 27 मार्च (हिं.स.)।
महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीच्या मतपत्रिका मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील 1202 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्व जिल्ह्यांच्या मतपेट्या मुंबईत एकत्र आल्यानंतर येत्या आठवडाभरात मतमोजणीला सुरुवात होईल, अशी माहिती आहे.
25 सदस्यीय महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलसाठी 24 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान घेण्यात आले. अमरावतीतील एकूण अडीच हजार वकील मतदारांपैकी 1202 मतदारांनी या प्रक्रियेत भाग घेतला.
या निवडणुकीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलमध्ये पाच महिलांना प्रतिनिधित्व देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापैकी तीन सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे, तर दोन सदस्य नामनिर्देशित पद्धतीने निवडले जातील.
यावर्षी स्थानिक पातळीवरून अमरावतीतून कोणीही निवडणूक लढवले नाही, हे विशेष होते. एरवी किमान एक किंवा त्याहून अधिक उमेदवार या निवडणुकीत असायचे. असे असूनही, मतदानाच्या दिवशी वकिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला आणि मतदानासाठी त्यांना अर्धा ते एक तास रांगेत उभे राहावे लागले.महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलमध्ये दादरा-नगरहवेली आणि दिव-दमण हे दोन केंद्रशासित प्रदेशही समाविष्ट आहेत. त्यामुळे कौन्सिलच्या एकूण सदस्यांची संख्या सुमारे 2 लाख 15 हजार एवढी आहे. मतदान केलेल्या सर्व वकिलांच्या मतपत्रिका त्यांनी नोंदवलेल्या पसंतीक्रमानुसार मोजणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे.या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळेच निकालाला एक ते दीड महिना एवढा कालावधी लागतो. मतमोजणी सुरू झाल्यानंतर, अंतिम निकाल येण्यास वेळ लागेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी