रत्नागिरी : पत्रकारांवर हल्ला प्रकरणात चिपळूणचे पत्रकार आंदोलनाच्या तयारीत
रत्नागिरी, 29 मार्च, (हिं. स.) : चिपळूणमधील बहादूरशेख नाका येथे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने चिपळूणमधील पत्रकारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूम
रत्नागिरी : पत्रकारांवर हल्ला प्रकरणात चिपळूणचे पत्रकार आंदोलनाच्या तयारीत


रत्नागिरी, 29 मार्च, (हिं. स.) : चिपळूणमधील बहादूरशेख नाका येथे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने चिपळूणमधील पत्रकारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आंदोलनाची तयारी सुरू केली असून, लवकरच रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या बुधवारी (दि. २५ मार्च) चिपळूण नागरी पतसंस्थेविरोधात बहादूरशेख नाका येथे काहीजण उपोषणास बसणार होते. या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार दीपक भागवत यांच्यावर काही गुंडांनी अचानक हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली. या वेळी त्यांचा मोबाइल आणि अन्य साहित्यही चोरून नेण्यात आले.

या घटनेचे व्हिडीओ उपस्थित नागरिकांनी मोबाइलवर चित्रित केले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये हल्लेखोर स्पष्टपणे दिसत असूनही पोलिसांकडून अद्याप अटकेची कारवाई झालेली नाही, याबाबत पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी महाराष्ट्र पत्रकार व प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी प्रतिबंध) कायदा, २०१७अंतर्गत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. तरीदेखील अपेक्षित ती तत्पर कारवाई होत नसल्याची भावना पत्रकारांमध्ये आहे.

यासंदर्भात झालेल्या बैठकीत पत्रकारांनी स्पष्ट इशारा दिला की, पुढील चार दिवसांत आरोपींना अटक झाली नाही, तर प्रथम शहरातून मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून, गरज पडल्यास जिल्हास्तरावरही आंदोलन छेडले जाईल.

पत्रकारांवरील हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून तो लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला मानला जातो. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी तातडीने, निष्पक्ष आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांकडून होत आहे. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande