
पुणे, 30 मार्च (हिं.स.) : आंबेगाव तालुक्यातील रांजणी आणि वळती या गावांतील वनविभागाच्या हद्दीत कोरडे पडलेल्या पाणवठ्यांमध्ये अखेर पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे परिसरातील पशू-पक्ष्यांची तहान भागण्यास मोठा दिलासा मिळाला आहे.
वळती आंबेगाव वनपरिमंडळात रांजणी, वळती आणि भागडी या तीन गावांच्या हद्दीत वनविभागाकडून एकूण पाच पाणवठे उभारण्यात आले आहेत. या पाणवठ्यांमुळे वन्यजीवांना पाण्याची उपलब्धता होत असते. मात्र, मागील काही दिवसांपासून रांजणी आणि वळती परिसरातील तीन पाणवठे पूर्णपणे कोरडे पडले होते. त्यामुळे पशू-पक्ष्यांचे हाल होत असल्याचे चित्र दिसत होते.
या परिस्थितीची दखल घेत पशुप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे पाणवठ्यांमध्ये तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाने तत्काळ कार्यवाही करत कोरड्या पाणवठ्यांमध्ये पाणी सोडले आहे.या निर्णयामुळे उन्हाळ्याच्या तडाख्यात त्रस्त झालेल्या वन्यजीवांना मोठा दिलासा मिळाला असून, स्थानिकांकडून वनविभागाच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु