
जळगाव , 30 मार्च (हिं.स.)। जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्गाचा कोप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात जोरदार वादळ, पावसासह गारपिटीचा इशारा देत ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे.
या अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे यंदा मार्च मध्ये हवामानात अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. एकीकडे मार्चमध्येच उष्णतेच्या तीव्रतेनं अंगाची लाहीलाही होत असताना त्यातच अवकाळी पावसाचे सावटही घोंगावत आहे. जळगावचे तापमान ४० अंशावर पोहोचल्याने उष्णतेचा तडाखा जळगावकरांना जाणवत आहे. दिवसासह रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाल्याने जळगावकर हैराण झाला आहे.दरम्यान, आता जळगावातील तापमानात आगामी काही दिवस बदल पाहायाला मिळणार आहे. हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढचे चार दिवस अवकाळी पावसाची स्थिती राहणार आहे. त्यात जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून जोरदार वादळ आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी आणि नागरिकांना अलर्ट राहण्याचे, काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.यंदाच्या मार्च महिन्यात जळगाव जिल्ह्यासाठी हवामान विभागाने दुसऱ्यांदा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर