
रत्नागिरी, 31 मार्च, (हिं. स.) : येथील सारस्वत स्नेहवर्धक मंडळ आणि स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने “नर्मदे हर : नर्मदा परिक्रमेचा दिव्य अनुभव” हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. येथील अध्यात्म मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात मिलिंद तेंडुलकर यांनी नर्मदा परिक्रमेतील आपले अनुभव कथन केले. त्यांच्या प्रवासातील विविध टप्पे, निसर्गरम्य स्थळे, तसेच परिक्रमेतील आध्यात्मिक आणि मानवी अनुभव यांचे सविस्तर वर्णन त्यांनी केले. या अनुभवांदरम्यान प्रा. सौ. विस्मया कुळकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मुलाखतीदरम्यान नर्मदा परिक्रमेच्या प्रवासाची छायाचित्रे आणि माहिती दर्शविणारे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. त्यामुळे श्रोत्यांना परिक्रमेचा अनुभव अधिक जिवंतपणे अनुभवता आला.
कार्यक्रमास स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे सचिव ऋषिकेश पटवर्धन, विवेक भावे, निखिल महाराज, सारस्वत स्नेहवर्धक मंडळाचे अध्यक्ष योगेश सामंत, सचिव प्रदीप तेंडुलकर आणि कोषाध्यक्ष सौ. मनीषा रेगे, सचिन तेंडुलकर, रमेश साखळकर, गुरुप्रसाद बोरकर आदी उपस्थित होते.
या प्रसंगी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि सारस्वत स्नेहवर्धक मंडळातर्फे मिलिंद तेंडुलकर यांचा सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी