
निफाड, 31 मार्च (हिं.स.) : शेतकरी. समन्वय समिती व ९३८ आदिवासी सहकारी संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला आता नवा आयाम देण्यात येणार आहे. या आंदोलनाला ११०० दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही शासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने समितीकडून 'शेतकरी वारकरी हरिनाम कीर्तन महोत्सव' आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक येथे सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येत्या १ जून रोजी आंदोलनाला ११०८ दिवस पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने कसबे सुकेणे (ता. निफाड) येथे १ जून ते ९ जून २०२६ दरम्यान हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून कीर्तनाच्या स्वरूपात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून, ग्रामीण भागात आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी सांगितले की, “शेतकरी समन्वय समितीच्या आंदोलनाला ११०० दिवस उलटून गेले तरी शासनाकडून दखल घेतली जात नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे हे आमचे प्रमुख ध्येय असून, f त्यासाठी आता हरिनाम कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV