
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते पाणी टँकरचा शुभारंभ
येवला, 31 मार्च, (हिं.स.)। येवला तालुक्यातील टंचाईग्रस्त १७ गावांमधील वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. आज माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते टँकरचा शुभारंभ करण्यात येऊन या सर्व गावांना टँकर रवाना करण्यात आले. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.
येवला तालुक्यातील टंचाईग्रस्त गावामध्ये कुणीही पाण्यावाचून वंचित राहणार यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच बैठक घेऊन तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव घेऊन त्याला तातडीने मंजुरी घेत पाणी पुरवठा करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार तातडीने येवला तालुक्यातील १७ टंचाईग्रस्त गावे व त्यातील वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
येवला साठवण तलाव परिसरात आज माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते टँकरचा शुभारंभ करत तातडीने टँकर रवाना करण्यात आले. यावेळी अद्यापही ज्या गावांना टंचाई आहे त्यांचा अहवाल घेऊन उर्वरित गावांनाही पाणी पुरवठा करण्यात यावा. यादृष्टीने तातडीने प्रस्ताव मंजूर करून घेण्यात यावे अशा सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, भूषण लाघवे, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे,.लोंढे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV