
अमरावती, 04 मार्च (हिं.स.)
मेळघाटातील मोबाईल नेटवर्क सेवा सुधारण्यासाठी जिल्हा संनियंत्रण समितीने १० मोबाईल टॉवरच्या कामाला मंजुरी दिली आहे. यात ९ बीएसएनएल आणि एक ऑप्टीक फायबरच्या टॉवरचा समावेश आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मेळघाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचे संनियंत्रण समितीची सभा पार पडली. यावेळी परतवाड्याचे विभागीय वन अधिकारी अनंता दिघोळे उपस्थित होते.
मेळघाटातील दहा बीएसएनएलच्या टॉवरला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने मंजुरी दिली आहे. मात्र प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी जिल्हा संनियंत्रण समितीची मंजुरी आवश्यक असते. त्यानुसार मेहरीआम, बिच्छुखेडा, खोकमार, घाणा, खामदा, धोकडा, मारीता, खंडुखेडा, भुत्रुम आणि चौराकुंड ते चोपन, रंगबेली ते धोकडा, रूईपठार ते भुत्रुम येथे भुमिगत ऑप्टीकल फायबर टाकण्यासाठी मान्यता देण्यात आली.
जिल्हा सनियंत्रण समितीच्या मान्यतेमुळे बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरचे काम सुरू होणार आहे. यामुळे नेटवर्कंगमध्ये गती येणार असून मोबाईलची सेवा जलद गतीने आणि विनाव्यत्यय होण्यास मदत मिळणार आहे. यासोबतच वनक्षेत्रात करण्यात येणारे जलसंधारण तसेच इतर कामांनाही मंजुरी देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी