
सोलापूर, 04 मार्च (हिं.स.)।
सोलापुरातील कुंभारीजवळील रे-नगर येथे देशातील सर्वात मोठा, ३० हजार घरकुलांचा गृहनिर्माण प्रकल्प साकारला जात आहे. १९ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचे लोकार्पण झाले. मात्र, दीड वर्षांहून अधिक उलटूनही तब्बल ११,२०० लाभार्थींना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या मिळालेल्या नाहीत, ही धक्कादायक बाब समोर आली आहे. लाभार्थींनी स्वतःचा हिस्सा न भरल्याचे कारण पुढे केले जात असले, तरी पैसे भरलेल्या सुमारे ३,८०० जणांपैकी सुमारे २०० कुटुंबच प्रत्यक्षात राहायला गेली आहेतरे-नगर गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन ९ जानेवारी २०१९ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते. ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण’ (म्हाडा)ने चार वर्षांत पहिल्या टप्प्यातील घरे पूर्ण केली. प्रत्येक लाभार्थ्यास केंद्र सरकारकडून अडीच लाखांचे अनुदान देण्यात आले असून, उर्वरित अडीच लाख रुपये स्वतःकडून भरावे लागतात. सुमारे १३ हजार लाभर्थींना बँकेकडून २.१० लाखांचे कर्ज मंजूर झाले आहे. त्यापैकी ४,५०० लाभार्थी नियमित हप्ते भरत असून २५० जणांनी स्वतःचा हिस्सा पूर्णपणे भरला आहे. अनेकांना बँक कर्जाचे सुरुवातीचे ३८ ते ४० हजार रुपये भरता आलेले नाहीत. बँकेचे हप्ते थकविलेल्या अडीच ते तीन हजार लाभार्थ्यांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती आहे. कारवाई टाळण्यासाठी फेडरेशनने सुमारे १९ कोटी रुपये भरल्याचे सांगितले जाते. मात्र, आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण न झाल्याने अनेक लाभार्थ्यांनी राहायला जाणे टाळले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड