
नांदेड, 07 मार्च (हिं.स.) - युवा संसद ही युवकांना लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणारी आणि अभ्यासपूर्ण चर्चा घडवून आणणारी महत्त्वाची संधी आहे. युवकांनी या व्यासपीठावर निर्भीडपणे आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने आपले विचार मांडावेत. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्य व देश पातळीवर लोकशाही मूल्य रुजविण्यासाठी युवकांकडून सकारात्मक कार्य घडू शकते. युवा संसदेमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होते, असे माय भारतच्या प्रतिनिधी व जिल्हा युवा अधिकारी चंद्रकला रावळकर म्हणाल्या.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आधिसभा सभागृहात युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार क्षेत्रीय निर्देशालय पुणे, माय भारत, नांदेड तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय 'विकसित भारत युथ पार्लमेंट 2026 संपन्न झाली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर व प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले.
या युवा संसदेसाठी विद्याथ्यांना आणिबाणी नंतरचे पन्नास वर्षे भारतीय लोकशाहीसाठी धडा हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेसाठी माय भारत पोर्टलवर १३१ स्वयंसेवकांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ३८ स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis