
बीड, 01 एप्रिल (हिं.स.)।
धारूर तालुक्यात मागील सहा दिवसांपासून बीएसएनएलची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मोबाईल नेटवर्क, कॉलिंग व इंटरनेट सेवा बंद असल्याने शासकीय कामे, बँक व्यवहार, ऑनलाइन सेवा ठप्प झाली आहे.
धारूर येथे बीएसएनएलचे स्वतंत्र कार्यालय नसल्यामुळे नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी केज येथे जावे लागत
असून, तेथील अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नाहीत. केज येथील अधिकाऱ्यांनी वायर कट झाल्यामुळे सेवा बंद आहे, मात्र तो विभाग आमच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोनही लागत नसल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना रोजच्या व्यवहारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सहा दिवस उलटूनही सेवा पूर्ववत न झाल्यामुळे बीएसएनएल प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन सेवा सुरळीत सुरू करावी, तसेच धारूर येथे कायमस्वरूपी कार्यालय सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या बाबीकडे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी लक्ष देऊन बीएसएनएल अधिकारी - कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी धारूर तालुक्यातील ग्राहक, बँक चालक, ऑनलाईन केंद्र चालकांनी केली आहे.
बीएसएनएल सेवा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा धारूर येथील नागरिकांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis