
बीड, 01 एप्रिल (हिं.स.)।
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा गावरान आंब्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे. नुकतेच पिकायला आलेले आंबे पाऊस तसेच वादळी वाऱ्याने गळून पडले आहेत. काही आंबे पावसामुळे खराब झाले आहेत.
शेकडो वर्षे जुन्या असलेल्या बहुतांश आमराया आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक झाडे जुनी झाल्याने त्या झाडांच्या फळांचा आकार लहान झाल्याने अनेक जुने झाडे शेतकऱ्यांनी तोडून टाकली आहेत. त्यामुळे गावरान आंब्याच्या आमराया आता बोटावर मोजण्याइतक्याच शिल्लक आहेत. या वर्षी आंब्याचे उत्पादन खूप कमी आहे. आताच कुठेतरी आमराईमध्ये आंबा पिकायला सुरवात होणार होती.
पुढील आठवड्यात हे आंबे काढून पिकायला घातले जाणार होते. पण सोमवारी अवकाळी पाऊस झाल्याने झाडावरील कच्चे आंबे पडले. त्यामुळे याचा फटका आंब्याच्या उत्पादनाला बसला आहे. अगोदरच या वर्षी आंब्याच्या झाडांना बहर कमी आहे. त्यात आता हे नुकसान झाले आहे.
शेतकरी आता आंबे काढून पिकायला घालणार होते. पण त्या अगोदरच पाऊस आल्याने झाडावरील आंबे पडले तसेच ते कुजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शेतातील कांदा, मोसंबी, गहू, लिंबू, ज्वारी, बाजरी, टरबूज, खरबूज, पपई भाव कमी असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी शेतात कांद्याचा ढीग लावून ठेवला. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावला आहे. त्यातच तापमान वाढल्यामुळे कांद्याच्या ढिगात उष्णतेचे प्रमाण जास्त झाल्यामुळे कांदा सडण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त कांदा शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागत आहे. अशा बिकट परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा पिकाला लागलेला खर्चसुद्धा निघाला नाही.
जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी आणि बाजरीची उभी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
बीड तालुक्यातील वरवटी आणि परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले. हाताशी आलेली बाजरीची पिके आडवी झाली. पाऊस असाच सुरू राहिला, तर कणसांना कोंब फुटण्याची भीती असून पिकाचा रंग बदलल्यामुळे त्याला बाजारात योग्य भाव मिळणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis