
अमरावती, 01 एप्रिल (हिं.स.)
शहरामध्ये भानखेडा मार्गावर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणात पीडित विद्यार्थिनीला ५० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी व सर्व आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी युवा काँग्रेस कार्यकर्ता समीर जवंजाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली.
अमरावती शहराच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत भानखेडा रस्त्यावर एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराची घटना अत्यंत धक्कादायक वसंतापजनक आहे. ही घटना संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह अशा निर्माण करणारी आहे. प्रकारच्या अमानुष कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील पीडित विद्यार्थिनीही सर्वसामान्य कुटुंबातील असून तिच्या पुढील शिक्षणावर व भविष्यातील आयुष्यावर याचा गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पुढाकार घेऊन पीडित विद्यार्थिनीला ५० लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच तिच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी. या प्रकरणातील सर्व आरोपींची नावे घोषित करण्यात यावी, त्यांच्याविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालविण्यात यावा, आरोपींना शक्य तितक्या लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन पीडित विद्यार्थिनीला न्याय व संरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी समीर जवंजाळ यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी