
छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल (हिं.स.)। पौराणिक कथांमधूनच भारत देशाची जडणघडण झाली आहे. माणसांच्या प्रेरणादायी कथांमधूनच व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी केले. नवलेखकांनी कथा लेखनासाठी पोलिसांचेही विषय निवडावेत असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव सुरु आहे. यानिमित्त महात्मा फुले सभागृहात कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. प्रभारी कुलसचिव डॉ.गणेश मंझा अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे, परीक्षक गेणू शिंदे, राजेंद्र गहाळ व वैशाली साबदे यांची मंचावर उपस्थिती होती. उद्घाटनप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख म्हणाले, लेकरु जन्माला आल्यापासूनच त्याला कथा सांगितल्या जातात. अभ्यासक्रमातही क्रमिक पुस्तकांमध्ये कथा शिकविल्या जात असतात. अशा प्रकारच्या कथाच आपयाला जगण्याचे सामर्थ्य मिळवून देत असतात. प्रेरणादायी कथा ऐकून आयुष्यात काही तरी होण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे. पोलीसाकडेही अनेक कथा असतात त्या जाणून घ्या, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी ’हा सूर्य आणि हा चंद्र’ या म्हणीमागची कथा विशद केली. अध्यक्षीय समारोपात डॉ.गणेश मंझा म्हणाले, चेह-यावरच्या हावभावावरुन माणसाचा स्वभाव व त्याच्या मनात काय चालू आहे, हे सांगता येऊ शकते. या विषयाच्या संशोधना संदर्भातही डॉ.मंझा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कथाकार राजेंद्र गहाळ यांनी ’लगीन पटका’ ही कथा सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. स्पर्धेतील विजेत्यांना १३ एप्रिल रोजी मुख्य कार्यक्रमात पारितोषिक वितरण करण्यात येईल, असे संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis