
बीड, 11 एप्रिल (हिं.स.) : आष्टी तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाला अखेर मोठा दिलासा मिळाला असून, राज्य शासनाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी तब्बल २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, या प्रकल्पासाठी आ. धस यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आता हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होण्याच्या मार्गावर आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी एकूण ५०० कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्यात २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे कार्यसन अधिकारी आनंद जावकर यांनी दि.९ एप्रिल २०२६ नुसार हा निधी मंजूर केल्याचे पत्र पाठविले आहे.
या निधीमुळे खुंटेफळ साठवण तलावाच्या कामाला गती मिळणार असून, आष्टी तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis