

रायगड, 11 एप्रिल (हिं.स.) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने सामाजिक समता सप्ताहानिमित्त ‘मार्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात पार पडली. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या पुढाकाराने सरखेल कान्होजी आंग्रे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार स्वातंत्र्य, समता व सामाजिक न्यायाची जाणीव रुजविण्यासाठी ८ ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान राज्यभर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वळण्यासाठी प्रेरित करण्यात आले.
कार्यशाळेत वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक प्रसाद लवटे यांनी मार्गदर्शन करताना ‘स्टँडअप इंडिया’ योजना तसेच राज्य शासनाच्या ‘मार्जिन मनी’ योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी उपलब्ध शासकीय योजनांचा कसा लाभ घ्यावा, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय, व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त सुनील जाधव, कार्यालय अधीक्षक माधुरी पाटील तसेच संस्थेचे मुख्याध्यापक प्रा. शैलेश जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेत शिक्षक, कर्मचारी, समतादूत आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गिते यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासोबतच उद्योजकतेसाठी आवश्यक शासकीय योजनांची माहिती मिळाल्याने या कार्यशाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)