
बीड, 11 एप्रिल (हिं.स.) :बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका या सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या मुख्य रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे कठोर निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याच्या सूचना दिल्या. या रस्त्यावर अनेक ठिकाणी सुरू असलेल्या खोदकामामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होत असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यासह बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की पावसाळा सुरू झाल्यानंतर कामात आणखी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यापूर्वीच मुख्य रस्त्याचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
या कामाच्या प्रगतीचा पुन्हा आढावा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतला जाणार असून, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास प्रशासनाकडून पुढील कठोर पावले उचलली जातील, असेही संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis