लातूर : पाणी वापराच्या योग्य नियोजनासाठी जनजागृती आवश्यक - जिल्हाधिकारी
लातूर, 15 एप्रिल (हिं.स.)। लातूर जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता पाण्याचे स्रोत मर्यादित आहेत. सिंचन प्रकल्प, विहिरी आणि विंधन विहिरींच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा विनियोग योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्ये
जिल्हाधिकारी


लातूर, 15 एप्रिल (हिं.स.)। लातूर जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता पाण्याचे स्रोत मर्यादित आहेत. सिंचन प्रकल्प, विहिरी आणि विंधन विहिरींच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा विनियोग योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येकामध्ये जनजागृती होणे आवश्यक असून, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्या'च्या माध्यमातून यासाठी प्रभावी प्रयत्न व्हावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले.

लातूर पाटबंधारे विभागामार्फत १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित या पंधरवड्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. यावेळी लातूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता तथा प्रशासक रूपाली ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, लातूर लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र काळे, रोहित जगताप, मयूर महाजन, अमरसिंह पाटील आणि जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेती आणि उद्योगासह सर्वच क्षेत्रांत पाण्याचा वापर करताना जास्तीत जास्त बचतीवर भर देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळावे, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन जनजागृती करावी. तसेच, भूजल पातळी वाढवण्यासाठी विहिरी आणि विंधन विहिरींच्या पुनर्भरणाची मोहीम अधिक गतीने राबवण्यात यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड म्हणाले. जलव्यवस्थापनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अधीक्षक अभियंता रूपाली ठोंबरे यांनी पंधरवड्याचा उद्देश स्पष्ट केला. जलसंपत्तीचे योग्य नियोजन करणे आणि लाभधारकांमध्ये याविषयी जागृती निर्माण करणे, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पंधरा दिवस जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे आणि जिल्ह्यातील पाच नद्यांच्या जलकलशांचे पूजन करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थितांना जल बचतीची शपथ देण्यात आली. त्यानंतर, जलव्यवस्थापन विषयक संदेश देणाऱ्या चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande