
बीड, 17 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून कमाल तापमान ४३.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने १८ एप्रिलपर्यंत जिल्ह्याला 'येलो अलर्ट' जारी केला असून वाढत्या तापमानामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी नागरिकांना दुपारी १२ ते ३ या वेळेत अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः वयोवृद्ध आणि लहान मुलांची उष्माघातापासून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी, ताक आणि लिंबू पाणी घेण्याचे तसेच बाहेर पडताना सुती कपड्यांचा वापर करण्याचे सूचित करण्यात आले आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis