
सोलापूर, 19 एप्रिल (हिं.स.)।
यंदा राज्यावर अल निनोचे संकट असल्याने पाऊसअपेक्षेपेक्षाकमीपडण्याची शक्यता आहे. अशावेळी उजनी धरणात असलेले पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. त्यामुळेच यंदा उन्हाळ्यात एकच आवर्तन देण्याचे सध्या ठरविण्यात आले असून पाण्याची उपलब्धता पाहून दुसऱ्या आवर्तनाचा विचार केला जाईल, असे गोरे यांनी सांगितले आहे. सध्या उजनीच्या मुख्य कालव्यातून उन्हाळी आवर्तनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी पिकाची काळजी मिटणार आहे.दरम्यान, सोलापूरला दुहेरी पाईपलाईन झाल्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीद्वारे सोडण्यात येणारे पाणी आता बंद झाले आहे. त्यामुळे नदीकाठच्या हजारो शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत असून यासाठी येत्या एक-दोन दिवसात भीमा नदीत पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन ही गोरे यांनी दिले आहे.
उजनीत सध्या 17 टक्के एवढा पाणीसाठा असून गेल्या वर्षीच्या तुलनेने परिस्थिती खूप चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. यातच आता सोलापूरला दुहेरी पाईपलाईनमुळे धरणातील जवळपास 12 टीएमसी एवढे पाणी वाचले असल्याचा दिलासाही मिळाल्याचे गोरे यांनी सांगितले. मात्र अल निनोमुळे संभाव्य दुष्काळाचे संकट येणार असल्याने प्रशासनाने पाण्याचे आधीच नियोजन केले असल्याचा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड