
रायगड, 02 एप्रिल (हिं.स.)।आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेमार्फत जिल्ह्यात ‘अमृत परिवार सर्वेक्षण अभियान’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान ८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार असून, मोठ्या प्रमाणावर कुटुंबांची माहिती संकलित केली जाणार आहे.
या मोहिमेद्वारे अशा समाजघटकांना प्राधान्य दिले जाणार आहे, ज्यांना इतर कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही. ब्राह्मण, सिंधी, मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, कायस्थ, नायर, जाट, बनिया यांसह विविध जाती-जमातींचा लक्षित गटात समावेश करण्यात आला आहे.
सर्वेक्षणादरम्यान अमृतचे प्रतिनिधी संबंधित कुटुंबांशी थेट संपर्क साधून त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीची माहिती घेणार आहेत. तसेच विविध संस्था, संघटना आणि मंडळांकडूनही आवश्यक माहिती संकलित केली जाणार आहे.
अमृतच्या योजनांमध्ये विद्यार्थी, महिला, तरुण, शेतकरी आणि व्यावसायिक यांच्यासाठी विविध उपक्रमांचा समावेश असून, या योजनांचा लाभ जास्तीत जास्त पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचविणे हा मुख्य उद्देश आहे.
जिल्ह्यातील लक्षित गटातील नागरिकांनी या कालावधीत अमृतच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून आपल्या कुटुंबाची नोंदणी करावी, तसेच योजनांची सविस्तर माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क: शैलेश मराठे – 9112228759 मंगेश ढेबे – 8149552143 अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ:
https://mahaamrut.org.in/�
जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे यांनी नागरिकांना या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)