
अमरावती, 02 एप्रिल (हिं.स.)
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी हुमायूं कबीर यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राणा यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले की, कोणत्याही पदासाठी धर्माच्या आधारावर दावा करणे चुकीचे असून ते देशाच्या संविधानाच्या भावनेविरुद्ध आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारत हा प्रभू रामांच्या विचारांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा देश आहे, जिथे सर्वांना समान अधिकार आहेत, असे त्यांनी नमूद केले.
देश धर्मनिरपेक्ष असून त्याला कोणत्याही एका धर्माशी जोडणे योग्य नाही, असेही त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी आपल्या वक्तव्यात पुढे असेही म्हटले की, “हुमायूं कबीर यांच्या सात पिढ्यांनी प्रयत्न केला तरी पश्चिम बंगालच नव्हे तर देशात बुरखा परिधान करणारी व्यक्ती महापौर किंवा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. असे स्वप्न पाहण्यापूर्वी त्यांनी शंभर वेळा विचार करावा. हा देश रामांच्या विचारांचा आणि संविधानाचा आहे. संविधान वाचणे आवश्यक आहे, ज्यामध्ये धर्मनिरपेक्षतेचा अर्थ एका धर्मापुरता मर्यादित नाही. देश धर्मनिरपेक्ष राहिला तर असे विचार लागू होऊ शकत नाहीत. हुमायूं कबीर यांनी आपण कुठून आलो आणि कुठे जाणार आहोत, याची जाणीव ठेवावी; अन्यथा या देशात त्यांच्यासाठी जागा उरणार नाही.”या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी